Thursday, November 24, 2011


अण्णा..... अहो जरा विचार करून बोला


शरद पवारांसारख्या बुजूर्ग नेत्यावर एका माथेफिरूने हला केला या घटनेचा प्रत्येक राजकीय पक्षाने आणि नेत्याने निषेध केला.
पण अण्णा हजारेंना याबद्दल विचारले असता अण्णांची पहिली प्रतिक्रिया होती
क्या एकही मारा?" …..एकदाच मारले?
व्हिडीओ लिंक http://www.youtube.com/watch?v=xWH4_NxU5E0
काय अण्णा!! काय बोलताय तुंम्ही!! अहो पवारसाहेबांबद्दल तुम्हाला राग असेलही पण हे जे काय तुम्ही बोललात ते चूकच आहे. सर्वच राजकारण्यांबद्दल जनतेच्या मनात रोष आहे पण म्हणून कोणि त्यांना मारहाण करायला जात नाही.
निषेध करण्याच्या अनेक पद्धती आणि सर्वमान्य मार्ग आहेतच की.
नंतर तुम्ही या घटनेचा आता कितीही वेळा निषेध केलात तरी तुमच्या मनात काय आहे ते कळलेच.
राळेगणसिद्धीतल्या दारूडयाला खांबाला बांधून मारणे वेगळे आहे आणि खरेतर चूकही आहे.
आणि अण्णा जनतेने तुंम्हाला मोठेपणा दिला याचा अर्थ असा नव्हे की आपण प्रत्येक विषयात आपण बोलायलाच पाहीजे

मी कायम  महात्मा गांधींच्या विचाराने जाणारा आहे असे तुंम्ही म्हणता मग हे काय बोलताय?

तुमच्या प्रतीक्रियेवर शरद पवारसाहेब बरोबर म्हणाले की " गांधीवादाची नवी व्याख्या आम्हाल कळली"

अण्णा हल्ली प्रत्येक घटनेबद्दल तुम्हाला पत्रकार आणि सामान्य लोक तुमचे मत काय असे विचारतात ,तुमचे नाव भारत भरच काय कदाहित जगभरही झाले असेल ,अण्णा तुमच्यामुळे लोकपाल येईल, तुमच्यामुळे माहीतीचा कायदा आला ,तुमच्यामुळे ग्रामविकास झाला हे अगदी बरोब्बर. 
पण म्हणून प्रत्येक गोष्टीवर तुम्ही मतप्रदर्शन करायला हवेच का?   

Wednesday, November 09, 2011

लग्नसमारंभ आणि प्रथा........................ 
एका मंगल कार्यालयाच्या पायर्‍या चढत असताना "आले आले" असा गलका ऐकू आला आणि मागाहून होणारी गडबड बघून जरा बाजूला झालो.
 नवरदेवांचे आगमन झाले होते आणि वधूकडील नातेवाईक मंडळींची धावपळ सुरू झाली होती.
 दारात येउन वधूच्या आईने वराला औक्षण केले त्याचे आणि वरमाईचे पाय दूधाने धुतले आणि पायघड्या घालत त्यांना आत नेले.
 नंतर दिवसभर अशाच पद्धतीने मुलाकडच्यांपुढे हांजी हांजी करणे चालूच होते.
 फोटो काढायचेत आधी मुलाकडच्यांचे काढणार.....
पंगत बसलीय आधी मुलाकडच्यांचे जेवायला बसणार....
असे अनेक प्रसंग दिवसभर घडत होते आणि मुलीचे नातेवाईक तत्परतेने आणि ब‍र्‍याच वेळा नाइलाजास्तव करत होते.
बर्‍याच वेळा लग्नांमधे वादाचे प्रसंग येतात आणि त्याला अश्या जुनाट प्रथाच कारणीभूत असतात. आपल्याकडील बहुतेक लग्ने अशीच होतात मी हे जे काही पाहीले अनुभवले ते काही विशेष होते असे नाही, पण हे असे का आणि कशासाठी असा प्रश्न मला कायम पडतो.
 नवरामुलगा आणि त्याचे नातेवाईक यांना खास वागणूक देण्याची ही पद्धत स्त्रीयांना ५०% आरक्षण देण्यार्‍या या एकविसाव्या शतकात अजुनही सुरूच आहे याचे मलातरी नेहेमीच आश्चर्य वाटते.
 मला असे नाही म्हणायचे की मु्लाकडच्यांना मान अजीबात देउ नये,.... जरूर द्यावा... पण तितकाच मान मुलीकडच्यांना पण द्यायला नको का?
 मुलीकडची बाजू म्हणजे पडती बाजू असे का असते?
 लग्न म्हणजे दोन व्यक्तीच नव्हे तर दोन घराण्यांना एकत्र आणणारी गोष्ट असेल तर एकमेकांना योग्य तो मानसन्मान देउन करायला काय हरकत आहे!!!
 हे सर्व लिहीण्याचे कारण की काही दिवसापूर्वी मी माझ्या मित्राच्या मुलीच्या लग्नाला जाउन आलो तेथील हा अत्यंत आनंददायी वेगळा अनुभव..............
 हा लग्नसमारंभ म्हणजे दोन्हीकडच्या नातेवाईक आणि मित्र मैत्रीणींचे get together होते.
एकही दुर्मुखलेला चेहरा दिसला नाही.
 लग्न नोंदणी पद्धतीने झाले आणि नंतर स्वागत समारंभ होता. पण आपण नेहेमी बघतो तसा मात्र नाही.

नेहमीच्या स्वागत समारंभाला फाटा देऊन एक उत्तम पार्टी झाली.
प्रवेशद्वारात मुलामुलीचे आई वडील हसतमुखाने पाहुण्यांच्या स्वागतासाठी उभे राहीले होते अणि जिव्हाळ्याने प्रत्येकाशी दोन शब्द बोलून त्यांचे स्वागत करत होते.
बर्‍यार्पै‍की मंडळी जमल्यावर नवरा नवरीने प्रवेश  केला आणि जमलेल्या सर्वांनी त्यांचे उभे राहून
टाळ्यांच्या कडकडात  स्वागत केले .
 पार्टी सुरू करण्यापूर्वी नवरा नवरी मध्यभागी उभे राहीले आणि त्यांच्या एका मित्राने त्यांचे लग्न कसे ठरले त्याची स्टोरी खुसखुशीतपणे सांगीतली आणि नंतर त्यांच्या जवळच्या नातेवाईकांची ओळख सगळ्यांना करून दिल्यानंतर एका भन्नाट  आणि धमाल पार्टीला सुरुवात झाली.

 पार्टीत सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची रेलचेल होती, Orchestra होता, उत्तम संगीत होते, डान्सफ़्लोअर होता

 मुख्य म्हणजे मुलगा मुलगी स्टेजवर खोटं खॊटं हसत पाहुण्यांना भेटण्याऐवजी पाहुण्यांमधे हिंडत फिरत त्यांना भेटत होते आणि दोघेही उत्तम डान्सर असल्यामुळे डान्सपण करत होते.
त्यांना एका उत्तम बॅंडची साथ होती.
 दोघांनी आलेल्या प्रत्येकाला थोडा वेळ का होइना डान्स करायला लावलाच . पुढ्चे तीन तास कसे गेले हे कोणालाच कळ्ले नाही .
 समारंभाची सांगता मुलीच्या मोठ्या भावाने स्वत: लिहीलेले आणि चाल दिलेल्या गाण्याने झाली .

 काळानुरूप आपणही बदलायला काय हरकत आहे.
 नवपरिणीत वधुवर आणि आलेल्या सर्वांनाच माझा सलाम.....................

Monday, June 06, 2011

उपोषण आणि प्रसिद्धी


उपोषण आणि प्रसिद्धी

सरकारने रामदेवबाबांची उचलबांगडी केली आणि त्यांच्या अनुयायांवर लाठीमार व अश्रुधूर सोडून त्यांना रामलीला मैदानावरून हुसकावले.
रामदेवबाबा आधी लपून बसले आणि नंतर स्त्री वेषात पळून जाताना त्यांना पोलिसांनी कसे पकडले ह्याची द्रुष्ये काल दिवसभर प्रत्येक चॅनेल्सवर दाखवली जात होती.
खरे तर रामदेव बाबांना पळून जाण्याची काय जरूर होती ?
स्त्री वेषात पळून जाण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा सरळ पोलीसांना सामोरे जाउन "करा मला अटक " असे म्हटले असते तर पोलीसांनी काय केले असते ? उलट रामदेवबाबाबा निर्भिड आहेत असे वाटले असते.

लपाछपी करायची यांना काय गरज होती? बाबा लपलेत म्हटल्यावर त्यांच्या अनुयायांची पळापळ सुरु झाली. रामदेवबाबांनी न लपता त्यांच्या अनुयायांना समजावले असते तर त्यांच्या अनुयायांची पळापळ झाली ती अजिबात झाली नसती आणि पोलीसांचे काम सोपे झाले असते .
आणि पोलीस म्हणतातच आहेत की आम्ही त्यांना अटक केलेली नाही आम्ही कायदा आणि सुव्यवस्था राहील एवढेच बघीतले आणि दिल्लीत गोंधळ होवू नये म्हणून त्यांना हरिद्वारला नेले.
काहीही झाले सरकारच्या आदेशांच्या शिवाय पोलीस असे काही करणार नाहीत, रामदेवबाबांना अटक करणे दूरच.

नंतर रामदेवबाबा सांगत होते की पोलीस माझा एन्काउंटर करणार होते.
रामदेवबाबांचे गेले काही दिवस लांगुलचालन करणारे सरकार का मारेल बाबांना?

अशी दडपशाही करून आंदोलन चिरडणे अत्यंत चुकीचे आहे आणि तसे करून सरकारने चूकच केलेली आहे पण राजकारणाकडे वाटचाल करू पाहणार्‍या बाबांचे पण चुकलेच आहे . अशा स्टंटबाजीने काय साधणार आहे?
मुळात या उपोषणाची काही गरज होती का? आणि रामदेव बाबांच्या सगळ्याच मागण्या योग्य आहेत का?

अण्णांनी आपल्या उपोषणाचा काळ हुषारीने निवडला होता विश्वचषकाचे सामने संपल्यानंतर लगेचच आणि
आय. पि. एल. संपायच्या आत. कारण अण्णांना नक्की माहिती होते की या क्रिकेटवेड्या देशात क्रिकेट सामन्यांच्या काळात आपल्याकडे फार कोणी फिरकणार नाही त्यामुळे अण्णांनी विश्वचषक आणि आय पि एल यांच्या मधील दिवसात उपोषण करून मिळवली .
आण्णा आणि बाबा यांच्यातील मतभेद लपून राहिलेले नाहीत त्यामुळे आपणही काहीतरी करायला पाहिजे असे बाबांना वाटत असावे.

सध्याचे सरकार भ्रष्ट आहेच आणि विरोधी पक्ष देखील सरकारवर दबाव आणण्याचे सोडून काही ही करून सत्ता प्राप्त कशी होईल याकडे बघत आहेत.अशा परिस्थितीत सामान्य नागरिक अण्णा हजारे आणि रामदेवबाबांच्या मागे जात आहेत.
पण प्रसिद्धीच्या मागे लागून हे दोघेही मूळ मुद्द्यांपासून दूर जात आहेत हे मात्र नक्की.

Tuesday, May 31, 2011

नामांतर

नामांतर......??????
राजकारणी लोकांना आपले नाव चर्चेत ठेवण्यासाठी नामांतर हा हमखास उपाय आहे ह्याची बहुधा खात्रीच पटली असावी.
मग त्यासाठी त्यांना कुठल्यातरी विद्यापीठाचे नाव बदलावेसे वाटते तर कधी एखाद्या गावाचे.
ब्रिटीशांनी ठेवलेली नावे बदलणे योग्य होते पण काहीवेळा अती उत्साहाच्या भरात बोलल्यामुळे हसे पण होते.
पुण्याच्या एका माजी महापौरांनी ससून रुग्णालयाचे नाव बदलण्याचे ठरवले होते आणि तसा ठराव मांडण्याची तयारी पण केली होती. त्यांना नंतर कळले की मुंबईतील डेव्हीड ससून नावाच्या   ज्यू गृहस्थांनी १८६७ साली दिलेल्या उदार देणगीतून  हे रूग्णालय उभे राहीले आहे .
डेक्कन जिमखाना नाव बदलून त्याला संभाजीनगर नाव देण्याचा पराक्रम माजी उपमुख्यमंत्री मुंढेसाह्र्बांनी केलेला आहे. पण किती जण ते वापरतात ? कोणीही नाही. आणि पुण्यात येउन कोणी "संभाजीनगरला कसे जायचे" असे विचारले तर कोणालाही काहीही सांगता येणार नाही. नावापुरती एक पाटी गोखले चौकात(गुडलक चौ्कात) लावलेली आहे.

रस्त्यांना आणि चौकांना माननियांच्या नातेवाईकांची नावे दिली जातात ,कशासाठी ? चौका चौकात कोणालाही माहीती नसलेल्याचे पुतळे उभारतात , कशासाठी?
बांद्रा वरळी समुद्र सेतूला राजीव गांधींचे नाव घाईघाई करून देण्यात आले. किती जण हे नाव वापरतात हा संशोधनाचा विषय ठरेल.

विद्यापिठ ज्या गावात असेल त्या गावाचे ना्वाने ते ओळखले जाणे हेच संयुक्तीक नाही का?
दोन गावांना जोडणारा रस्ता त्या गावांच्या नावानेच ओळखला जाणे हेच संयुक्तीक नाही का?
 

Monday, May 30, 2011

चिन्मय गणाधिश टोप-संभापूर कोल्हापूर

चिन्मय गणाधिश टोप -संभापूर कोल्हापूर



कोल्हापूरला जाताना टोप गावाजवळ एक प्रचंड गणेशमूर्ती दिसते .
पुण्याहून कोल्हापूरला जाताना टोप गावाजवळ हायवेपासून अंदाजे दिड किमी वर हा गणपती आहे हायवेवरून तो दिसतोच. पण या वेळी मात्र जवळून दर्शन घेवून आलो . येथे पार्किंगची उत्तम सोय आहे. साधारण पन्नास पायर्‍या चढून जावे लागते परंतू बरोबर वयस्क किंवा अपंग असतील तर वरपर्यंत गाडी नेता येते.चिन्मय मिशनने इथला परिसर अतिशय स्वच्छ ठेवला आहे




साधारण ८०० टन वजनाची ही मूर्ती ६१ फूट उंच आहे आणि २५ फूट उंचिच्या "ध्याननिलयम" सह जवळ जवळ ८५ फूट उंच आहे एवढा प्रचंड आकार असूनसुद्धा मूर्ती अतिशय सुबक आहे. चिन्मय मिशनने कर्नाटकातून ५० कारागीरांकडून १८ महीन्यात ही मूर्ती बनवून घेतली आहे. 
मूर्ती डाव्या सोंडेची आहे पुढचा उजवा हात वरदहस्त आहे .मागील उजव्या हातात अंकुश, मागील डाव्या हातात पाश व पुढील डाव्या हातात मोदक आहे.

Tuesday, January 25, 2011

प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

सर्व वाचकांना प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

Saturday, January 15, 2011

गूगल ग्रॅव्हिटी ट्रिक

गूगल ग्रॅव्हिटी ट्रिक एक गंमत
 तुमच्या ब्राउझर च्या सर्च विंडोमधे "Google Gravity"  असे टाईप करा आणि I am feeling lucky वर क्लिक करा आणि मजा बघा
किंवा खालील लिंक् वर क्लिक करा आणि काय गंमत होते ते बघा.

http://mrdoob.com/projects/chromeexperiments/google_gravity/